Monday, July 26, 2021

11:44 AM

VVS Laxman's Ramrajya

 लक्ष्मणाचं रामराज्य!

द्वारकानाथ संझगिरी 



कोलकत्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध  फॉलो ऑनचं विष पचवून आपण जिंकलो, त्याला गेल्या आठवड्यात २० वर्षं झाली. अजूनही आपण एक परिकथा ऐकलीय असंच वाटतं. स्टीव्ह  वॉ तेव्हा सिकंदराच्या थाटात आला होता. त्या कसोटीच्या चौथ्या दिवशी मॅच संपणार, तो जग जिंकल्याचं घोषित करणार असे सर्व मांडे तो मनात खात होता. मद्याची लाडकी बाटली त्यानं ड्रेसिंग रूममध्ये आणून ठेवली होती. पण एका माणसानं त्याचं स्वप्न उद्ध्वस्त केलं. त्याच नाव होतं : वांगीपुरुप्पू वेंकटसाई लक्ष्मण. या लक्ष्मणानं कांचनमृग पकडला. सीतेचं अपहरण होऊ दिलं नाही. जुन्या लक्ष्मणरेषा पुसून टाकल्या. आणि एक नवीन लक्ष्मणरेषा आखली.


त्या दिवशी लहानपणी शिकलेला एक वाक्प्रचार अपुरा वाटला.‘पराभवाच्या कराल दाढेतून बाहेर काढणं वगैरे...’ लक्ष्मणनं विजयाचा घास स्टीव्ह वॉ याच्या जठरातून बाहेर काढला. तो घास निघाला होता आतड्यांमध्ये जायला... पुढं जाण्याआधी थोड्या आठवणी जागवत ठेवतो.


ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ४४५ धावा केल्या. भारतीय संघ १७१ धावांत कोसळला. त्यांनी फॉलो ऑन दिला. फरक तब्बल २७४ धावांचा. स्टीव्ह वॉ याचं चुकलं असं कुणाला वाटलं नाही. एक माणूस होता, ज्याला ‘स्टीव्ह चुकला’ असं वाटलं. आमचा वासू परांजपे. त्याचा मित्र त्या वेळी ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूममध्ये होता. त्याला वासूनं सांगितलं :‘फॉलो ऑन देऊ नका.’ त्याची स्टीव्ह वॉला सांगायची हिंमत झाली नाही. हे अलीकडेच वासूनं पुस्तकात लिहिलेलं आहे. मी स्टीव्ह वॉ असतो तर वासूच्या पायावर डोकं ठेवलं असतं.


असो, तर काय सांगत होतो? हां, पहिल्या डावात लक्ष्मणनं ५९ धावा केल्या. त्या वेळी तो सहाव्या क्रमांकावर खेळला होता. दुसऱ्या डावात गांगुली मास्टरस्ट्रोक खेळला. त्यानं लक्ष्मणला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं. तरीही एक वेळ अशी होती की भारताची धावसंख्या ४ बाद २३८ होती आणि फॉलो ऑनच कर्ज चुकतं झालेलं नव्हतं. तिथून हा सामना भारतानं जिंकला.


मॅच जिंकण्यात आणखी दोघांचा वाटा महत्त्वाचा होता. एक राहुल द्रविड, दुसरा हरभजनसिंग. राहुलनं १८० धावा करून ३७६ धावांची मोठी भागीदारी लक्ष्मणबरोबर केली. तलवारीला ढाल लागते, ती राहुलनं पुरवली आणि हळूहळू ती ढालसुद्धा तलवार झाली. समोर लक्ष्मणच्या रुद्रावतारानं प्रभावित होऊन राहुलच्या बॅटनं तांडवनृत्य शिकायला सुरुवात केली. त्यानं ५१ च्या स्ट्राईक रेटनं धावा केल्या.


दुसरा वाटा होता हरभजनचा. त्यानं १३ बळी सामन्यात घेतले. शेवटच्या दिवशी टी टाईमपर्यंत ऑस्ट्रेलियानं फक्त ३ बळी गमावले होते. तिथून हरभजननं मॅच जिंकून दिली. एरवी, हरभजन ‘मॅन ऑफ द मॅच’ झाला असता; पण लक्ष्मणच्या झंझावाताचा झपाटा असा होता की इतर वादळं किरकोळ वाटली. सन १९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनला सुनील अशीच खेळी खेळला होता. पहिल्या डावात शतक ठोकून दुसऱ्या डावात द्विशतक.


२८१ च्या खेळीनं लक्ष्मण क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाला. विस्डेननं इतिहासातल्या सर्वश्रेष्ठ खेळीची एक यादी  तयार केलीय. त्यात लक्ष्मणची खेळी सहाव्या क्रमांकावर आहे. का नसणार? तेल कुणीही पेटवेल, यानं पाणी पेटवलं!

चौथ्या दिवशी सकाळी त्यानं आणि राहुलनं पहिल्या तासात ओव्हरमागं ७ धावांच्या सरासरीनं धावा केल्या. 


कुणासमोर? मॅग्रा आणि गिलेस्पी. लढाईत रक्ताचे पाट वाहतात. इथे चौकारांचे पाट वाहत होते. स्टीव्ह वॉ यानं कबूल केलं की ऑस्ट्रेलियन संघ प्रथम तिथं खचला. मग लक्ष्मणनं वॉर्न याला निःशस्त्र केलं. लेग स्टंपबाहेरच्या बूटमार्क्समधून तो चेंडू वळवत होता. लक्ष्मणनं त्याला लाँग ऑनला स्पिनच्या विरुद्ध दिशेला ड्राईव्ह मारले. हे सोपं नसतं. मग वॉर्ननं लेगला तटबंदी वाढवली. आणि पुन्हा लेगस्टंप बाहेरून चेंडू फिरवले. लक्ष्मणनं पुढं जात ऑफला ड्राईव्ह मारले. सर्वोच्च दर्जाचा फलंदाज फक्त हा खेळ खेळू शकतो. आता याच्या पुढं काय करावं ते आपल्याला कळेना, असं वॉर्न यानं कबूल केलं. 


माणूस वादळ रोखू शकत नाही. ते ओसरेपर्यंत तो ते फक्त हताशपणे पाहू शकतो. ऑस्ट्रेलियानं ते केलं. तोपर्यंत विध्वंस होऊन गेला होता. संघाला पराभवापासून वाचवायला लक्ष्मण खेळलाच नव्हता, तो जिंकण्यासाठी खेळला होता. काही संकटं अशी टाळता येतात. लक्ष्मणनं कसोटी जिंकली. आणि मालिका जिंकली.


त्यानं आपल्या स्वभावापलीकडे काही केलं नाही. त्याआधी सिडनीला त्यानं १९८ चेंडूंत १६७ धावा ठोकल्या होत्या. त्यात २७ चौकार होते. तो काय चेंडूच्या योग्यतेनुसार खेळला? ऑस्ट्रेलियन गोलंदाज एका फलंदाजाला २७ चौकार देऊ शकत नाहीत. ते त्यानं त्यांच्याकडून लुटले. त्यांच्या भावना न दुखावता. त्यांना सौंदर्याची भूल घालून. २७ चौकारांचे शिलालेख त्यानं प्रेक्षकांच्या मनावर कोरले. सचिननं त्याला खूश होऊन ओकली गॉगल दिला. तो स्वाक्षरी देत असताना एक वयस्कर आवाज त्याच्या कामात घुमला...‘तू आज माझा दिवस सार्थकी लावलास,’ ते होते जॉर्ज हॅवर्ड. ऑस्ट्रेलियाचे तेव्हाचे पंतप्रधान!


त्यानंतरची ही त्याची मोठी खेळी.

‘राहुलसारखं खेळ,’ असं त्याला सांगणं म्हणजे देवानंदला धोतर नेसायला सांगण्यासारखं होतं. रसिकता शिस्तबद्ध होऊ शकते; संन्यासी नव्हे. ती शिस्तबद्ध झाल्यावर त्यानं सन २००३ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये धूमशान घातलं. तेव्हा ईयान चॅपेल त्याला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण’ असं म्हणाला होता.


लक्ष्मणची कसोटी सरासरी आहे ४६, जवळपास १३४ कसोटींत. तेही जास्त काळ सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करून. वर खेळला असता तर ५० पर्यंत गेला असता कदाचित; पण लक्ष्मणच्या सरासरीचं कुणाला काय देणं-घेणं! शॅम्पेन ही मद्यार्कावर मोजत नाहीत. महत्त्वाचं असतं ते तिचं फसफसून बाहेर येणं. लक्ष्मणची फलंदाजी हे सेलिब्रेशन होतं, आकडेमोड नव्हे.


भारतीय क्रिकेटच्या प्रत्येक युगात एक राम होता. नावं बदलली. कधी हजारे, कधी सुनील, कधी सचिन, कधी विराट; पण ज्या लक्ष्मणानं एका महत्त्वाच्या मालिकेत रामराज्य आणलं तो एकच. वांगिपुरुप्पू  वेंकट साई लक्ष्मण.


(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

11:40 AM

Gentleman, Well Mannered Ken Williamson


सज्जन, सुसंस्कृत केन विलियम्सन

द्वारकानाथ संझगिरी

भारतीय संघानं कसोटी क्रिकेटची चॅम्पियनशिप न जिंकल्याबद्दल एक भारतीय म्हणून मला दुःख जरूर झालं; पण राष्ट्रप्रेमाचा भाग सोडला तर, क्रिकेटप्रेमी म्हणून एका सज्जन, सुसंस्कृत क्रिकेटपटूच्या संघाला यशानं ‘वरलं’ हे पाहून आनंदही झाला. ती चॅम्पियनशिप ‘सुस्थळी’ पडली. भारताबाहेरचे दोन क्रिकेटपटू मला प्रचंड आवडतात. एक दक्षिण आफ्रिकेचा ए. बी. डिव्हिलिअर्स (एबीडी) आणि दुसरा न्यूझीलंडचा केन विलियम्सन.



एबीडीनं वन डे आणि टी-२० ची फलंदाजी नावीन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेत नेऊन ठेवली, तर केननं, कसोटी फलंदाजीची सर लेन हटन, सुनील गावसकर, राहुल द्रविड यांच्या परंपरेची विझत चाललेली ज्योत प्रज्वलित केली!


दोन वर्षांपूर्वी ‘लॉर्डस्’वर पाहिलेला केन माझ्या डोळ्यासमोर आहे. कुठलाही सुपरस्टार नसलेल्या संघाला तो स्वतःचं नेतृत्व आणि स्वतःच्या बॅटमधून प्रेमानं वाहणाऱ्या धावांच्या जिवावर अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला होता. बरं, तो अंतिम सामना हरलाच नाही, सामना एकदा नव्हे तर, दोनदा बरोबरीत सुटला. तरी एका खुळ्या, काहीही लॉजिक नसलेल्या नियमामुळे इंग्लंडनं त्याच्या हातून विश्वचषक खेचून घेतला. दुर्भाग्यसुद्धा ‘आपण काय करून बसलो’ असं म्हणालं असेल त्या वेळी! पण केननं ते दुःख मनातच दाबून टाकलं. त्यातून निर्माण होणारी चीड, खदखद त्यानं आपल्या जिभेपर्यंत पोहोचू दिली नाही. ‘जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया मैं उस को भुलाता चला गया’ म्हणत त्यानं कसोटीच्या विश्व चॅम्पियन्सशिपच्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली. पुन्हा तो संघ घेऊन शिखरावर आला. शिखर पुन्हा इंग्लंडमध्ये होतं; पण या वेळी त्यानं नशिबावर काहीही सोपवलं नाही. स्वतःच्या नेतृत्वावर आणि बॅटच्या जोरावर त्यानं संघाला विजय मिळवून दिला.


नियतीलाही प्रायश्चित्त घेतल्याचं समाधान मिळालं असेल! पण तेव्हाही केन तसाच शांत, सुसंस्कृत होता...त्या पराभवात होता तसाच.


ढगाळ वातावरण आणि पावसाची अपेक्षित ये-जा या बाबी लक्षात घेऊन त्यानं पाच वेगवान गोलंदाज खेळवले. ते पहिलं योग्य दिशेनं त्यानं टाकलेलं पाऊल होतं. टॉस जिंकून भारताला फलंदाजी दिल्यावर त्याच्या स्विंग गोलंदाजांना अपेक्षित यश सुरुवातीला मिळालं नाही; पण तरीही केन शांत होता. दुसऱ्या दिवशी त्यानं वेगवान गोलंदाजीमध्ये योग्य ते बदल केले आणि अक्षरशः प्रत्येक फलंदाजासाठी त्याच्या ताकदीनुसार किंवा कमकुवतपणानुसार त्यानं जाळं टाकलं. भारतीय फलंदाज त्यात अडकत गेले. रहाणे तर कमालीचा अडकला. न्यूझीलंडमध्ये वॅगनेरनं रहाणेला असंच वारंवार बाद केलं होतं; पण ठेच लागूनही रहाणे शहाणा झाला नाही.


क्षेत्ररक्षणात बदल करून योग्य जागी क्षेत्ररक्षक आणून ठेवल्यानंतर त्याच्या हाती थेट झेल जाणं यासारखी तृप्तता कर्णधाराला दुसरी नसेल. सन १९७१ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दुराणीनं सोबर्सची विकेट काढल्यावर लॉईड बॅटिंगला आला आणि स्लिपमधला वाडेकर मिड ऑनला गेला. दुराणीला धक्का बसला. वाडेकरनं त्याला सांगितलं, ‘मी योग्य जागी उभा आहे.’ आणि अक्षरशः पुढच्या चेंडूवर लॉईडचा फटका थेट वाडेकरच्या पोटात आला. तिथं मॅच फिरली आणि त्याचबरोबर रबरसुद्धा. केनच्या बाबतीत हे दोनदा घडलं. दुसऱ्या डावात त्यानं शमीसाठी यष्टिरक्षकाच्या मागं अशा जागी एक क्षेत्ररक्षक ठेवला की तिथं सहसा कधी क्षेत्ररक्षक ठेवलाच जात नाही आणि त्याच्या डावपेचाला शमीच्या बॅटनं कुर्निसातच ठोकला! त्यानं त्याचा झेल त्या जागी उभ्या केलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात अक्षरशः सोपवला.


आपल्या विराट कोहलीचा चेहरा हा त्याच्या मनातल्या भावनांचा आरसा आहे. त्याचा राग, त्याची निराशा, आनंद, आश्चर्य जे काही त्याच्या हृदयात उमटतं ते त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. त्याचा चेहराच बोलतो असं नाही, त्याचं शरीरही बोलत असतं.


विराटच्या उलट केन आहे. त्याचा चेहरा हा ओपेक काचेसारखा आहे. साऊदीनं स्लिपमध्ये पंतचा झेल सोडल्यानंतर मनातून केन नक्कीच निराश झाला असेल. तडफडला असेल. चिडला असेल. आणि असं जर झालं नसेल ना तर तो माणूसच नाही! मात्र, असा कुठलाही भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. एक किंचित निराशा चमकून गेली एवढंच. कारण, तो क्षण मॅच हातून निसटवणारा क्षण ठरू शकत होता आणि त्याची दोन्ही डावांतली फलंदाजी ही मूर्तिमंत कसोटी फलंदाजी होती.


परवाच मी गुंडाप्पा विश्वनाथची मुलाखत वाचली. ‘कुठला फलंदाज तुला सर्वोत्तम कसोटी फलंदाज वाटतो?’ असं त्याला विचारलं गेलं. अगदी माझ्या मनातलं उत्तर त्यानं दिलं. तो म्हणाला, ‘केन विलियम्सन.’ त्यानं कारणही दिलं. तो म्हणाला, ‘फ्रंट फूट असो किंवा बॅक फूट, फिरकी गोलंदाजी असो किंवा स्विंग वेगवान गोलंदाजी, ऑफ साईड असो किंवा ऑन असो...त्याच्या फलंदाजीत चुका शोधणं हे अत्यंत कठीण आहे. जितकी तांत्रिक बाजू दणकट, तितकंच त्याचं टेम्परामेंटसुद्धा घट्ट आहे.’


मॅच जिंकताना रन रेट आपल्या कह्यात राहील हे केननं पाहिलं; पण त्या रन रेटसाठी फाजील आक्रमकता दाखवली नाही. केन आणि त्याचा आधीचा कर्णधार ब्रॅंड्स मॅक्कलम यांच्यात हाच फरक आहे. केनला समोर त्याचं ध्येय दिसत होतं. त्याला तो ध्येयाकडे जाणारा रस्ता दिसत होता आणि त्या रस्त्यावरून कसं चालायचं हे त्यानं पक्कं ठरवलं होतं. त्याचप्रमाणे तो चालत गेला.


मॅचच्या शेवटच्या दिवशी फलंदाजीचं वातावरण हे सर्वात पोषक असलं तरी छोटे पाठलाग मुळीच सोपे नसतात. आश्विनला लागोपाठ दोन बळी मिळाल्यानंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ४४ होती आणि जवळपास १०० धावांचा पल्ला शिल्लक होता. त्याची मधली फळी अननुभवी आणि फारशी ताकदवान नाही, त्यामुळे जिंकण्यासाठी केननं शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं होतं. त्यानं अनुभवी रॉस टेलरला बरोबर घेऊन आपला दर्जा, आपला अनुभव आणि आपलं टेम्परामेन्ट पणाला लावलं. टेलर एरवी तसा आक्रमक फलंदाज आहे; पण समोर केनची फलंदाजी पाहून त्यानं केनचं टेम्परामेन्ट, केनचं शांत मन उसन घेतलं असावं!


न्यूझीलंड हा ५० लाखांचा देश आहे. त्यात क्रिकेट हा त्यांचा प्रमुख खेळ नाही. त्यातून उभारलेला संघ हा माणूस घेऊन लढतो. आणि समोर कोण होतं? तर दीडशे कोटींच्या देशातून उभारलेला संघ. सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून मिरवणारा देश... सर्वात श्रीमंत आणि सुपरस्टार्सनी भरलेला म्हणून मिरवणारा संघ...आणि तरीही या सज्जन, सुसंस्कृत कर्णधारानं सर्वसाधारण कसोटी दर्जाच्या खेळाडूंना बरोबर घेऊन या बलाढ्य संघाला हरवलं. कदाचित भारताची पत गेली नाही; पण न्यूझीलंडची पत मात्र खूपच वर गेली.


(सदराचे लेखक हे ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

11:37 AM

Great Matchwinner spinner Chandrashekhar

 सर्वश्रेष्ठ मॅचविनर

द्वारकानाथ संझगिरी 

परवा खूप दिवसांनी भागवत चंद्रशेखरशी बोलणं झालं. त्याचा वाढदिवस होता. त्यानं ७७ व्या वर्षात पदार्पण केलं. अधूनमधून मी त्याच्याशी गप्पा मारत असतो आणि बोलण्याचे विषय ठरलेले असतात. क्रिकेट, सैगल, मुकेश वगैरे.





गेल्या वर्षी त्याच्यासाठी मी मुंबईत मुकेशच्या गाण्यांचा कार्यक्रम ठरवला होता. दिवस ठरला. हॉल बुक झाला. मुख्तार हा भारतातला मुकेशचा आवाज आज मानला जातो, तो येऊन गाणार होता. चंद्रशेखर येणार म्हणून तोही सुखावला होता; पण कोरोना आला आणि आमचे सगळे मनोरे वाळूचे ठरले; पण ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ असं ज्या दिवशी वाटेल, त्या दिवशी कार्यक्रम करायचा असं आम्ही ठरवूनच टाकलं. त्याची संपूर्ण कारकीर्द तशी मी लांबूनच पाहिलीय. तो मित्र झाला, अलीकडे दहा-पंधरा वर्षं झाली. चंद्रानं गोलंदाजी टाकायला सुरवात केली की भरगच्च स्टेडियम ‘बोsssल्ड’ असं त्याच्या स्टार्ट बरोबर ओरडायचं. त्यात माझाही आवाज असायचा.


‘त्याचा फास्टरवन थॉम्सनपेक्षा जास्त वेगात येतो,’ असं व्हिव्हियन रिचर्डस् चंद्राबद्दल जेव्हा वदला ना (मोठी माणसं नेहमी वदतात, आपण बोलतो.) तेव्हा अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यात मीही होतो.


सन १९७१ मध्ये ओव्हलची टेस्ट जिंकल्यानंतर शिवाजी पार्कला सर्व नाचले. त्यात मीही होतो. आणि माझ्या हातात वाडेकरबरोबर चंद्राचासुद्धा फोटो होता. त्यानं पेटवलेल्या थेम्स नदीचा थरार मी आदल्याच दिवशी त्याच शिवाजी पार्कच्या गवतात मित्राच्या ट्रान्झिस्टरवर अनुभवला होता. परवा मी त्याला सहज विचारलं : ‘‘त्या ओव्हल कसोटीत इंग्लडच्या दुसऱ्या डावात फील्डिंगला जाताना तुला, तुझ्या हातून पुढचा वणवा पेटणार आहे, याची जाणीव होती का रे?’


तो म्हणाला : ‘छे रे. अजिबातच नव्हती; पण मी विश्वनाथला सहजच म्हटलं होतं की, मला काहीतरी करून दाखवायचं आहे.’’ नियतीनं बहुतेक ते ऐकलं आणि ती ‘तथास्तु’ म्हणाली.


चंद्रशेखरनं काही ठरवून कधी केलंच नाही. नियती त्याचा दिवस ठरवायची आणि त्याच्या मनगटातून भारतीय क्रिकेटचं एखादं देदीप्यमान पान लिहून घ्यायची. आमचा राजू भारतन तर नेहमी म्हणायचा, Bedi thinks before he spins while Chandra spins before he thinks.


‘चंद्रशेखर हा मी पाहिलेला भारताचा सर्वश्रेष्ठ मॅचविनर,’ हे विधान मला अजूनतरी बदलावं लागलेलं नाही. त्यानंतर अनेक मॅचविनिंग गोलंदाज भारतासाठी खेळले. प्रसन्ना, कपिलदेव, कुंबळे आता अश्विन, बुमराह...पण चंद्रा आहे तिथंच आहे. कुठल्याही खेळपट्टीवर विकेट मिळवण्याची ताकद त्याच्या मनगटात होती. बघता बघता तो डाव उलटवायचा.


बाकीच्या मॅचविनर्सपेक्षा त्याला जर काही थोडंसं जास्त मिळालं असेल, तर करिअरच्या टॉपवर असताना त्याला अत्यंत उत्कृष्ट क्लोज इन क्षेत्ररक्षक मिळाले. त्यात वाडेकर होता, व्यंकट होता, आबिद अली होता आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगला सोलकर तर होताच होता. मला आजही आठवतंय की, माधव आपटेंच्या घरी पार्टी होती आणि वेस्टइंडियन प्लेअर्स आले होते त्या वेळेला वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी सांगितलं होतं की, ‘आम्हाला चंद्राची भीती वाटतेच; पण चंद्रापेक्षा जास्त भीती आम्हाला एकनाथ सोलकरची वाटते. कारण, त्याचा हात फक्त येताना दिसतो, तो दिसत नाही.’


पण इतर बाबतीत चंद्रा आजच्या पिढीपेक्षा दुर्दैवी होता. एकंदरीत त्या काळामध्ये जागतिक दर्जाचे फलंदाज अनेक होते आणि खूपच मोठे होते. बॅरिंग्टन होता, ग्रेव्हिनी होता, सोबर्स होता, कनाय होता, लॉईड होता, रिचर्डसं होता, ग्रिनीच होता, सिम्सन होता, लॉरी होता, पीटर बर्ज होता...अनेकांना त्यानं गोलंदाजी केली. आणि नुसती गोलंदाजीच नाही केली, तर त्यानं दादागिरीसुद्धा केली. सर्वात महत्त्वाची जी गोष्ट चंद्राला मिळाली नाही ना त्या काळात, ती होती न्यूट्रल पंच आणि DRS. परवा, दिलीप वेंगसरकरनं कुठं तरी म्हटलंय की, ‘न्यूट्रल पंच आणि DRS जर चंद्राला मिळाले असते ना, तर त्यानं ८०० विकेट्स घेतल्या असता.’ ही अतिशयोक्ती आहे असं समजू नका. न्यूट्रल पंच आणि DRS नसल्यामुळे अनेक निर्णय चंद्राच्या विरोधात गेले. न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया वगैरे ठिकाणी तर चंद्राला कितीतरी भयानक पंच भेटले. चंद्रा हा तसा अत्यंत शांत माणूस. न चिडणारा. तांडव वगैरे मैदानावर न करणारा. एकदा न्यूझीलंडमध्ये त्यानं एका फलंदाजाला बोल्ड केलं. तरीही त्यानं अपील केलं. तेव्हा पंच त्याला म्हणाले : ‘अरे, अपील काय करतोयस? तो तर बोल्ड झालाय.’ तो म्हणाला : ‘हो. बोल्ड झालाय; पण तो बाद आहे का?’ इतका तिथल्या पंचगिरीवर तो वैतागलेला होता.


सन १९७८ मध्ये त्यानं मेलबर्नवर १२ विकेट्स घेऊन कसोटी सामना जिंकून दिला. खरं तर तो ब्रिस्बेन, पर्थलासुद्धा जिंकून देऊ शकला असता; पण पंचांनी त्याच्या काढलेल्या विकेट्स काढून घेतल्या; किंबहुना ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन बॉबी सिम्सन तर एका डावात तीन तीन डाव खेळायचा.त्याला पहिल्या फटक्यात बाद द्यायचं नाही हा गुप्त वटहुकूम असावा. महत्त्वाची गोष्ट अशी होती की, मध्यंतरी इम्रान खाननं लेग स्पिनर अब्दुल कादिर याच्याबद्दल बोलताना असं म्हटलं होतं की, ‘अब्दुल कादिर हा शेन वॉर्न पेक्षा जास्त मोठा लेन स्पिनर आहे.’


इंग्लडच्या ग्रॅहाम गूचचंसुद्धा हेच मत आहे आणि त्यानं ते मत मांडताना असं म्हटलं होतं की, ‘त्या काळात फलंदाज जर फ्रंट फूटवर असेल तर पायचीत सहसा दिलं जात नसे.’ चंद्राच्या बाबतीतसुद्धा हा प्रश्न उद्भवला होता.


चंद्राची जी ताकद होती, ती कशात होती? ती त्याच्या चेंडूच्या वेगात होती. तो वेगात चेंडू टाकायचा. तो वेगात चेंडू वळवायचा. त्याचा चेंडू उसळी घ्यायचा. म्हणजे एका अर्थी त्याच्या हातात त्रिशूलच होतं. ते त्रिशूल झेलणं हे खूप मोठ्या फलंदाजांनाही जमलेलं नाही. मला त्याच्या काही विकेट्स तर फार आठवतात.


म्हणजे ब्रेबॉनला १९६४ मध्ये त्याचा चेंडू पीटर बर्गची ऑफ बेल घेऊन गेला होता. काय सुंदर चेंडू होता! ऑस्ट्रेलियाला ग्रेग सार्जंट त्रिफळाचित झाला, तेव्हा त्याला कळलंच नाही की नेमकं काय झालं. त्याला वाटलं की भुताटकीच झाली. त्याची सर्वोत्कृष्ट विकेट म्हणजे इंग्लंडमधली बॅरिंग्टनची. बॅरिंग्टन हा एक महान फलंदाज होता. त्याचा बचाव भेदून जाणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती. तो ९७ वर बॅटिंग करत होता. चंद्रशेखरनं त्याचा बोल्ड काढला. त्या वेळी इंग्लंडचा गाजलेला लेखक अ‍ॅलेक्स बॅनिस्टर आश्चर्यचकित झाला आणि त्यानं असं लिहलं की, ‘बॅरिंग्टन इतका सेट झालेला होता की त्याला फक्त भूकंपच हलवू शकेल असं वाटत होतं.’ चंद्रा असेच भूकंप घडवून आणायचा.


त्याच्या कारकीर्दीत आपण १४ कसोटी जिंकल्या. त्यात चंद्रानं १९ च्या सरासरीनं ९८ बळी घेतले. ज्या वेळी यश हे ‘कपिलाषष्टीचा योग’ मानलं जायचा तेव्हा हे यश त्यानं मिळवलं. अगदी भारतीय खेळपट्टीवरसुद्धा त्या वेळी त्याला धावांचं पाठबळ मिळालं नाही. ३०० धावा म्हणजे डोक्यावरून पाणी. कितीतरी वेळा धावा पाठीशी नाहीत म्हणून त्याचा पराक्रम मातीमोल ठरला. महत्त्वाची गोष्ट अशी की, चंद्राचा उजवा हात पोलिओमुळे बारीक झालेला असला, कमकुवत असला तरीसुद्धा त्यानं क्षेत्ररक्षण कधी टाळलं नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता. आणि डाव्या हातानं तो थेट चांगला थ्रो करायचा. फक्त त्याच्या हातामुळे त्याला फलंदाजी जमली नाही आणि त्यानं काढलेल्या विकेट्सपेक्षा त्याच्या धावा कसोटी क्रिकेटमधल्या कमी आहेत. तो किती साधा आणि मुकेशप्रेमी! एकदा सुनीलला त्यानं बीट केलं. सुनील त्या चेंडूचा विचार करत असताना चंद्रा त्याला म्हणाला : ‘‘सुना क्या?’’


सुनील म्हणाला : ‘क्या?’


चंद्रा म्हणाला : ‘मुकेश का गाना...’


प्रेक्षकांतून कुणाच्या तरी रेडिओवर मुकेशच गाणं ऐकू येत होतं.


सन १९७१ मध्ये इंग्लंडहून जिंकून आल्यावर विमानतळ चंद्राला पाहायला माणसांनी तुडुंब भरला होता आणि चंद्रा काय करत होता? तो राजू भारतनला शोधत होता. राजू त्याला सैगलची दुर्मिळ रेकॉर्ड देणार होता. क्रिकेटप्रेमींच्या देव्हाऱ्यातले देव नेहमी वाढत राहतात. मग मागचे विसरले जातात. मी नशीबवान, माझ्या देव्हाऱ्यातले बरेच देव मित्र झाले.


चंद्रा त्यातला एक.


(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

11:34 AM

Selection committee and Indian Cricket Captain

 


कणा असाच ताठ राहू देत

द्वारकानाथ संझगिरी

भारतीय क्रिकेट निवड समितीच्या पाठीला कणा आहे, हे परवा चेतन शर्मानं दाखवून दिलं ते बरं केलं. रवी शास्त्री, विराट कोहली यांची आणखी एका आघाडीच्या फलंदाजाची मागणी त्यानं धुडकावून लावली. हा कणा उभा करण्याचं काम अर्थातच बीसीसीआयनं केलंय हे सांगायची काही गरज नाही. त्याशिवाय हे काही घडलं नसतं. विराट आणि शास्त्री यांच्या डोक्यात, आपणच भारतीय क्रिकेट चालवतो, ही वाफ शिरली होती आणि बोर्डानं ती वाफ काढून टाकायची पहिली झडप उघडली.



काही वर्षांपूर्वी भारताच्या तीन महान खेळाडूंनी अनिल कुंबळेला प्रशिक्षक केलं. त्या वेळी कुटील कारस्थान करून विराट आणि शास्त्री यांनी शिस्तप्रिय कुंबळेला दरवाजा दाखवला आणि शास्त्री पुन्हा प्रशिक्षक झाला. त्या वेळी हे महान खेळाडूसुद्धा नमले होते. ‘कर्णधाराला जसा हवा तसा संघ द्यावा’ किंवा ‘त्याला हवा तो प्रशिक्षक द्यावा’ या सबबीखाली सर्व काही चालवून घेतलं गेलं; पण हे चुकीचं होतं. कर्णधाराचं मत संघनिवडीच्या बाबतीत किंवा प्रशिक्षकाच्या बाबतीत जरूर घेतलं जावं; पण त्याच्याच ओंजळीनं पाणी पिणं हे काही योग्य कारभारच लक्षण नव्हतं.


भारतीय क्रिकेटच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर लक्षात येईल, एक जमाना असा होता की निवड समितीला फक्त कणाच होता, इतर काहीही नव्हतं. दादागिरीवर निर्णय घेतले जायचे आणि खेळाडूंची गुणवत्ता या दादांच्या खिजगणतीतही नसायची.


सी. के. नायडू हे माझ्या वडिलांच्या पिढीचे ‘सचिन तेंडुलकर’. महान फलंदाज. वयाच्या ६२ वर्षी शेवटची रणजी ट्रॉफी ते खेळले आणि त्यातही त्यांनी अर्धशतक ठोकलं; पण ते निवड समितीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी तिथं मनमानी सुरू केली. सन १९५२ च्या इंग्लंडच्या दौऱ्यावर त्यांनी विनू मंकड यांना संघात घेतलं नाही. मंकड हे तेव्हाही भारताचे सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू होते. का घेतलं नाही? तर मंकड हे त्या वेळी पोटासाठी इंग्लंडमध्ये लीग क्रिकेट खेळत होते आणि त्यांनी फक्त कसोटी सामन्यात खेळण्याची परवानगी मागितली होती.


‘मी छप्पन्न मंकड उभे करीन’ असा नायडू यांचा तोरा होता, म्हणून त्यांनी पहिल्या कसोटीत मंकड यांना वगळलं. मग पहिली कसोटी भारतीय संघ मानहानिकारकरीत्या हरला. दुसऱ्या कसोटीसाठी म्हणजे ‘लॉर्डस्’ कसोटीसाठी त्यांना मंकड यांना निमूटपणे घ्यावंच लागलं आणि ती ‘लॉर्डस्’ कसोटी पुढं ‘मंकड्स टेस्ट’ म्हणून ओळखली गेली. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, मंकड यांनी पहिल्या डावात आघाडीला जाऊन ७२ धावा केल्या. मग त्यांनी तब्बल ७३ षटकं टाकली, त्यात त्यांनी ५ विकेट्स काढल्या. पुन्हा दुसऱ्या डावात त्यांनी १८४ धावा केल्या आणि पुन्हा इंग्लंडच्या दुसऱ्या डावात २४ षटकं टाकली. ‘दात घशात घालणं’ या वाक्प्रचाराचं हे चपखल उदाहरण!


माधव आपटे यांच्यासारखा क्रिकेटपटू, ज्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये फक्त ७ सामन्यांमध्ये ४९.२७ च्या सरासरीनं ५४२ धावा केल्या. ते पुढं कसोटी सामना खेळलेच नाहीत. काय कारण होतं माहितेय? आपटे यांच्या वडिलांकडे ‘कोहिनूर मिल’ची त्या वेळी होलसेल एजन्सी होती. त्या वेळच्या निवड समितीच्या एका सदस्याला, त्यातली सब-एजन्सी हवी होती. ती आपटे यांच्या वडिलांनी त्याला दिली नाही, म्हणून तो राग माधव आपटे यांच्यावर काढला गेला आणि माधव आपटे यांची कारकीर्द संपवली गेली. असे अनेक किस्से त्या काळी घडत.


हल्ली सगळेच खेळाडू हाफ पॅंटमध्ये फिरतात. सुरेंद्रनाथ नावाचा त्या वेळचा वेगवान गोलंदाज मिलिटरीत होता. तो हाफ पॅंटमध्ये आलेला निवड समितीच्या एका सदस्याला आवडलं नाही. त्या सदस्यानं त्याला सांगितलं, ‘जा, फुल पॅंट घालून ये.’ त्यानं नकार दिला. तो निवड समितीचा सदस्य त्याला म्हणाला, ‘तू आयुष्यात पुन्हा कधीही कसोटी सामना खेळू शकणार नाहीस.’ आणि तसंच घडलं. अशी मनमानी अनेक प्रकारे चालत असे.


एवढा मोठा सुनील गावसकर; पण त्याच्यावरही निवड समितीच्या सदस्यांना जोकर म्हणायची वेळ आली होती आणि मग ‘आय रिग्रेट’ असं म्हणावं लागलं होतं.


सचिन तेंडुलकरला त्याला हवी तशी टीम निवड समितीनं कधीच दिली नाही. खरं तर, आज विराट जशी दादागिरी करतो तशी दादागिरी सचिन त्या वेळी सहज करू शकत होता. कारण, सचिन हा भारतीय क्रिकेटचा चेहरा होता. बोर्डाच्या अंगणात जी पैशाची गंगा अवतरली होती तीत त्याच्या पराक्रमाचा वाटा मोठा होता...पण सचिनचा तो स्वभाव नव्हता, ती दादागिरी करण्याची त्याची वृत्ती नव्हती. त्यानं नेतृत्वच सोडून दिलं.


आता काळ अक्षरशः ३६० कोनातून फिरला आहे. खेळाडू वाघ झाले आहेत आणि निवड समितीचे सदस्य मांजर झाले आहेत. त्यांना लाखो रुपये मिळायला लागले आणि त्यामुळे ते मिंधे झाले. खरं तर ‘रबर स्टॅम्प’ झाले.


विराट आक्रमक आहे. आपला चेहरा हा आता भारतीय क्रिकेटचा चेहरा आहे हे त्याला माहीत आहे. रवी शास्त्री हा एकंदरीत स्वभाव, विचार आणि महत्त्वाकांक्षा याबाबतीत अतिशय योग्य असा गुरू त्याला लाभलेला आहे, त्यामुळे दोघांची ही जोडी भारतीय क्रिकेट चालवत असते. दोघांच्या आवडी-निवडी अत्यंत तीव्र आहेत, त्यामुळे इतरांचं कारण नसताना नुकसान होऊ शकतं.


करुण नायर आवडत नाही म्हणून, त्रिशतक करूनसुद्धा, त्याचं करिअरचं संपून गेलं.


रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाला न घेऊन जाण्यासाठी काय काय केलं गेलं! कारण, त्याला ‘चल ए, फूट’ म्हणता येत नाही. रहाणेसारख्या खेळाडूला किती दबावाखाली या जोडगोळीनं वागवलं. त्याला टी-२०तून बाहेर काढलं. त्याला वन डेतून बाहेर काढलं. आज तो केवळ उपकर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाच्या गुणामुळे तो संघात कसाबसा आहे; पण त्याच्यावर इतका दबाव टाकला गेलेला आहे की, जर इंग्लंडमध्ये तो परफॉर्मन्स करू नाही शकला तर संघाबाहेर कधीही फेकला जाऊ शकेल. म्हणजे खेळाडूला कोपऱ्यात आणायचं, त्याच्यावर दबाव टाकायचा आणि तो बाहेर जाईल हे बघायचं. अशा चाली बऱ्याच वेळा कर्णधाराकडून खेळल्या जाताना आपण पाहतो. हे त्यांच्या दादागिरीमुळे. आणि निवड समितीनं बोटचेपं धोरण स्वीकारलं तर असं सहज करणं शक्य आहे.


धोनी हा कितीही मोठा खेळाडू असेल; पण त्याच्या कारकीर्दीत ज्या पद्धतीनं सेहवाग, गांगुली आणि लक्ष्मण बाहेर गेले ते ‘काढले गेले’ या सदराखालीच येतात.


आघाडीच्या फलंदाजांची मागणी केली गेली तेव्हा चेतन शर्माच्या डोळ्यासमोर १९८६ ची ‘लीड्स’ कसोटी आली असेल. मनोज प्रभाकर असलेल्या संघात, ‘लीड्स’वर चेंडू स्विंग होणार म्हणून, संघात नसलेल्या मदनलालला कर्णधार कपिलनं संघात घेतलं. तो इंग्लंडमध्ये लीग खेळत होता. मला ती सकाळ आठवते. मी आणि चेतन शर्मा हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये ब्रेकफास्ट करत होतो.


पार खचून गेलेला झालेला प्रभाकर समोरच होता. एकाकी, अबोल...आणि ज्या खेळपट्टीवर मदनलाल आग लावू शकतो तिथं स्विंगनं रान पेटवण्याची कुवत असणारा...!


पुढं तो सावरला; पण कपिल आणि त्याच्यातून विस्तव जात नव्हता.


म्हणूनच तिथं आघाडीचे तीन फलंदाज असताना चौथा पाठवल्यावर किमान दोघांचा ‘मनोज प्रभाकर’ झाला असता.


आज अभिमन्यू ईश्वरन राखीव खेळाडू आहे. तो विराटला उघडउघड आवडत नाही.


त्या वेळी प्रदीप सुंदरम हा वेगवान गोलंदाज राखीव होता. इंग्लंडमध्ये तो लीग क्रिकेट खेळत होता; पण त्याचाही विचार झाला नाही. मदनलाल कानामागून आला आणि तिखट झाला. ती मॅच आपण जिंकली. मदनलाल यशस्वी झाला; पण त्या खेळपट्टीवर कुणीही जरा बरा स्विंग टाकणारा गोलंदाज यशस्वी झाला असता.


कारण, जे करायचं ते खेळपट्टीच करणार होती. गोलंदाजाला योग्य टप्पा टाकायचा होता. रवी शास्त्री संघात होता.


त्याला हे आठवतच असेल. असो.


मी एवढंच म्हणेन, कणा असाच ताठ राहू देत.


(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

11:25 AM

Md Azar century at Lords stadium

 मैदानावरचं पेंटिंग! Cricket paining on Stadium

By

द्वारकानाथ संझगिरी 



इंग्लंडमध्ये मी अनेक भारतीय फलंदाजांची शतकं पहिली. ती मला माझ्यापुढं कुणीतरी फेकलेल्या विविध हिऱ्यांसारखी वाटतात. प्रत्येक हिरा हा विविध कारणांसाठी अनमोल; पण त्यातला एक हिरा उचलून जर इंग्लंडच्या ‘क्राऊन ज्वेल्स’ या म्युझियममध्ये ठेवायचा असेल तर मी ठेवेन १९९० चं ‘लॉर्डस्’चं महंमद अझरुद्दीनचं शतक.


फलंदाजीच्या नजाकतीचं ते नयनरम्य प्रदर्शन होतं. बूच काढलेल्या बाटलीतून वर फसफसणाऱ्या शाम्पेनसारखे त्याचे ते मुलायम फटके त्याच्या बॅटमधून फसफसून वर येत होते. अझरच्या शतकाप्रीत्यर्थ मी संध्याकाळी ‘लॉर्डस्’च्या पबमध्ये शाम्पेन घेत असताना एका सुरकुतलेल्या हातातल्या ग्लासानं माझ्या ग्लासाला हात भिडवला. मी वळून पाहिलं. एक अत्यंत वृद्ध अशी गोरी इंग्लिश व्यक्ती होती. टाय लावलेली. सूट घातलेली. आणि डोळ्यांत थोडंसं पाणी आलेलं.



रणजितसिंह म्हणजे रणजी. म्हणजे ज्या नावानं रणजी स्पर्धा आहे ती. तो रणजी, जो एकेकाळी इंग्लंडसाठी खेळायचा आणि इंग्लंडच्या प्रेक्षकांना त्याच्या नजाकतीबद्दल तो प्यारा होता. एका गोऱ्या इंग्लिश क्रिकेटप्रेमीच्या डोळ्यात काळ्या अझरसाठी आनंदाश्रू होते.


या खेळीची पार्श्वभूमी वैशिष्ट्यपूर्ण होती. अझर भारतीय संघाचा नवखा कर्णधार होता आणि बेदी होता कोच-कम-मॅनेजर. बेदीचं काय बिनसलं होतं, मला काही आठवत नाही आता; पण बेदीनं ‘भारतीय संघ हा अरबी समुद्रात नेऊन बुडवावा,’ असं एक अतिशय तुफान विधान केलं होतं. त्यानंतर असं घडलं की अझरनं ‘लॉर्डस्’ला टॉस जिंकला आणि त्यानं इंग्लंडला फलंदाजी दिली. स्वतःच्या पायावर मारून घेतलेली ती गोळी होती. कारण, इंग्लडनं ४ बाद ६५३ धावा उभ्या केल्या. किरण मोरेनं गूच ३३ वर असताना दिलेलं जीवदान महागात पडलं. गूचनं ३३३ धावा केल्या आणि अर्थातच त्यामुळे अझरच्या निर्णयावर टीकेची झोड उठली; पण अझरच्या चुकीचं प्रायश्चित्त इतकं सुंदर, कलात्मक आणि नयनरम्य असेल असं वाटलं नव्हतं. उन्हानं उजळलेला तो शनिवार फक्त अझरचा होता आणि ‘लॉर्डस्’ झालं होतं, फटक्यांची आर्ट गॅलरी...! एक कलावंत मैदानाच्या कॅनव्हासवर अप्रतिम चित्र रेखाटत होता.


अझरनं ८७ चेंडूंत शतक ठोकलं. तो १२१ धावांवर दुसऱ्या दिवशी बाद झाला तेव्हा त्यानं १२१ धावा या १११ चेंडूंत केल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेट १०९.८ होता आणि त्यानं २२ चौकार ठोकले होते. छे! ‘ठोकले होते’ हा शब्दच चुकला. ते त्यानं रेखाटले होते. कुंचल्याप्रमाणे अत्यंत कमी वजनाच्या बॅटनं.


हेमिंग्ज् यानं त्याला १२१ धावांवर वळणाऱ्या ऑफ ब्रेकवर बोल्ड केलं. तो ऑफ ब्रेक त्यानं कव्हरमधून मारण्याचा प्रयत्न केला, तो फसला. तेव्हा हेमिंग्ज् याच्या एका डोळ्यात नक्कीच एक दुःखाश्रू असावा. कारण, आर्ट गॅलरीच्या बाहेर जायचं एक्झिट गेट इतक्या लवकर यावं असं त्यालासुद्धा वाटलं नसेल.


त्या कसोटीत गूचनं पहिल्या इनिंगमध्ये त्रिशतकी (३३३) खेळीनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये आणखी एक शतक (१२३) ठोकलं. लॅम्बनं १३९ धावा ठोकल्या. रॉबिन स्मिथनं १०० धावा ठोकल्या. रवी शास्त्रीनं १०० धावा केल्या; पण या सर्व शतकांच्या आठवणी कधीच पुसून गेलेल्या आहेत. मनाच्या भिंतीवर एकच पोर्ट्रेट लटकतंय.अझरच्या त्या शतकाचं!


तो फलंदाजीला आला तेव्हा भारतीय धावसंख्या ३ बाद १९१ वगैरे होती. वेगवान लुईसनं त्याच्या मधल्या यष्टीचा वेध घेऊन चेंडू टाकला. अझरनं टाचा उंचावल्या आणि बॅक फूटवर त्याला ढकललं. जगाला वाटलं की अझर बचावात्मक खेळतोय; पण चेंडूला ती त्याच्या मनगटातून आलेली छुपी ताकद जाणवली होती. वेडापिसा होऊन तो चेंडू मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातावर तुरी देऊन थेट समोरच्या जाहिरातीच्या बोर्डावर कधी आपटला हे कळलंच नाही. त्यानंतर त्याचं मनगट हे मायकल जॅक्सनच्या शरीरापेक्षा लवचिक वाटायला लागलं. ते ठरवायचं चेंडूनं कुठं जायचं, अगदी शेवटच्या क्षणी, गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकांना हतबुद्ध करत! सुईत दोरा ओवावा तसा चेंडू दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चक्क ओवला जायचा. मला त्याचे काही फटके आजही आठवतात.


डेवेन माल्कमनं टाकलेल्या अचूक टप्प्याच्या किंचित अलीकडे पडलेल्या चेंडूवर अझर बॅकफूटवर गेला आणि त्यानं तो स्ट्रेट ड्राईव्ह मारला. जवळपास तसाच चेंडू त्यानं नंतर स्वेअर लेगमधून पाठवला. तिसरा किंचित आखूड टप्प्याचा मिळाल्यावर त्यानं जी स्वेअर कट मारली त्यानं बॉलच्या डोक्याला झिणझिण्या आल्या असाव्यात. स्वेअर कट किंवा एखादा त्यानं मारलेला हूक पाहून त्याच्या फटक्यातल्या मोठ्या ताकदीची जाणीव व्हायची. एरवी, फक्त बॅटचा चेंडूशी हळुवार रोमान्स चालायचा. प्रेक्षकांना आणि गोलंदाजांना तो रोमान्स गुदगुल्या करणारा होता.


अझर उंच असल्यामुळे तो ज्या वेळी फटका खेळतो त्या वेळी त्याचं शरीर सुंदर आकार घेतं. किंचित बाळसं धरलेली पांढरी वेताची छडी वाकावी तसं त्याचं शरीर वाकायचं. अझरची ग्रिप पाहिली की त्याचं ऑनच्या फटक्यावरचं प्रेम का आहे हे आपल्याला कळतं. त्यातही तो ऑफ स्टम्पबाहेरचे चेंडू ऑनला, मिड विकेटला आणि स्वेअरला अगदी आरामात फ्लिक करतो; पण त्या दिवशी त्यानं ऑफच्या चेंडूवर जे काही कव्हर ड्राईव्हज् मारलेत ना ते कव्हर ड्राईव्हज् पाहताना उगाचच अझरला ‘ऑन साईडचा प्लेअर’ म्हटलं गेलं असं वाटलं. म्हणजे, त्यानं एकामागून एक सुंदर कव्हर ड्राईव्हज् मारले आणि ते कव्हर ड्राईव्हज् कुठल्याही इतर फलंदाजाच्या कव्हर ड्राईव्हएवढेच प्रेक्षणीय होते. उलट, त्याचा एक फ्लिक स्वेअर लेगला जायच्या ऐवजी स्लिपमधून गेला, त्याच्या फलंदाजीतला मला आठवणारा तो एकमेव कुरूप फटका. त्याला जीवदान म्हणता येणार नाही; पण तरीसुद्धा अझर बचावला असं म्हणता येईल.


प्रेस बॉक्समध्ये त्या वेळी जॉन वुडकॉक हा तिथल्या ‘टाइम्स’ला लिहिणारा एक बुजुर्ग पत्रकार होता. तो ब्रॅडमन पाहिलेला माणूस होता. त्यानं दुसऱ्या दिवशी जे काही लिहिलं ते शब्द मला आजही आठवताहेत. त्यानं इंग्लिश फलंदाजांना सांगितलं की, ‘अरे बाबांनो, अझरची फलंदाजी डोळे भरून पाहा; पण त्याच्या शैलीची नक्कल करू नका. इंग्लिश रक्ताला त्याची सवय नाही.’


माझ्या आयुष्यातला तो एक सुंदर जुलै महिना होता. त्या जुलै महिन्यात मला असं जाणवलं, की माणसाच्या हातात कला असेल तर सामान्य गोष्टीतून काय काय साध्य होऊ शकतं! मायकेलॅंजेलोच्या हातांनी छिन्नीनं दगडामध्ये तयार केलेली शिल्प मी पाहिली. ब्रश आणि रंग हातात घेऊन लिओनार्डो द विंचीनं तयार केलेली मोनालिसा मी पाहिली. आणि इथं हा एक मैदानावरचा कलावंत एका लाकडाच्या फळकुटानं फलंदाजी कलात्मकतेच्या अगदी वरच्या स्तरावर घेऊन जात होता. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी एक अनमोल ठेवा आहेत.


माझ्यासारख्या सामान्य माणसाला अशा अलौकिक गोष्टी पाहायला मिळणं याहून दुसरं भाग्य ते काय!


(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

11:20 AM

Sourav Ganguly called "tail" to Steve Waugh

 


स्टीव्ह वॉला गांगुलीनं चक्क शेपूट म्हटलं होतं

Sourav Ganguly called "tail" to Steve Waugh 

द्वारकानाथ संझगिरी



‘क्रिकेट हा सद्गृहस्थांचा खेळ आहे,’ असं एकेकाळी म्हटलं जायचं. आता म्हटलं तर तो अतिशयोक्ती-अलंकार होईल किंवा ज्याला इंग्लिशमध्ये Sarcasm म्हणतात तशी ती वक्रोक्ती होईल. क्रिकेटमध्ये पूर्वी खेळाडूंच्या दुर्वर्तनाबद्दल शिक्षा देणारे कायदे असे काहीही नव्हते.


सुरुवातीला त्रयस्थ पंच आले. मग मॅच रेफरी आला. आता डीआरएस आलंय. त्याचबरोबर लेवल एक, लेवल दोन आणि लेवल तीनच्या अपराधांसाठी चक्क पीनल कोडही आलंय. दंडही आलेले आहेत. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टींची पूर्वी कधीही गरज नव्हती. कारण, क्रिकेट हा सद्गृहस्थांचा खेळ मानला जायचा. अर्थात्‌, त्या वेळी सद्गृहस्थाच्या व्याख्येला आव्हान देणारी मंडळीही होती.


अगदी एटीकेट्स पाळणाऱ्या इंग्लडमध्येसुद्धा! डब्ल्यू. जी. ग्रेस हा इंग्लिश क्रिकेटचा पितामह. एकदा त्याला पंचानं बाद दिल्यानंतर त्यानं पंचाला सरळ सांगितलं :‘‘बाद कसला देतोस? लोक मला पाहायला आलेले आहेत. तुला नाही.’’ आणि तो थेट खेळायलाही लागला. 


इंग्लडंच्या फ्रेडी ट्रुमन या गोलंदाजाची जीभ ही शिव्यांची, अपशब्दांची आणि अपमानित करणाऱ्या विशेषणांची ओसरी होती! शब्द वाटच बघत असायचे जिभेवरून बाहेर उडी घेण्यासाठी. सभ्य शब्दांना तिथं मज्जाव होता. एकदा रमाकांत देसाईनं ‘लॉर्ड्‌स’वर त्याला षटकार ठोकला. काय बोलला असेल तो रमाकांतला? तो म्हणाला : ‘‘पुन्हा जर असं काही केलंस ना, तर मी तुला मागच्या साईट स्क्रीनवर बॉलनं चिकटवून टाकेन.’’


- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


खरं सांगायचं तर आजच्या काळाचा जर विचार केला तर आजच्या पिढीला हे कदाचित ‘बोबडे बोल’ वाटतील! कारण, हे असं बोलणं हे आजचे क्रिकेटपटू त्यांच्या बालवाडीत शिकतात! ऑस्ट्रेलियानं ‘गेम्समनशिप’ या नावाखाली त्याचे वेगवेगळे कोर्सेसच सुरू केलेले आहेत आणि मग त्या कोर्सेसच्या शाखा जगभर पसरत गेल्या. भारतातही निघाल्या. सौरभ गांगुलीनं तर चक्क महाविद्यालय उभारलं! गांगुली हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पुरून उरणारा असा माणूस होता. म्हणजे ऑस्ट्रेलिया ‘आ रे’ म्हणाला तर तो ‘का रे’ म्हणायला अजिबात कचरायचा नाही. एकदा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ हा फलंदाजीला आला. काय केलं असेल गांगुलीनं? तो स्लिपमधून ओरडला : ‘‘कमॉन बॉईज्‌, नाऊ द ऑस्ट्रेलियन टेल हॅज बिगन.’’ 


म्हणजे स्टीव्ह वॉला त्यानं चक्क शेपूट म्हटलं होतं. हत्तीच्या गंडस्थळाला कपाळ म्हणण्यासारखी ती गोष्ट होती; पण गांगुली या गोष्टी ऑस्ट्रेलियन मंडळींकडूनच शिकला होता. ऑस्ट्रेलियाच्या टीममध्येसुद्धा कधी काळी ‘सभ्य गृहस्थ’ होते यावर माझा आज विश्वासच बसत नाही. ओल्डफील्ड नावाचा त्यांचा एक यष्टिरक्षक होता. तो फलंदाज जर बाद असेल तर अपील करायचा; पण अत्यंत अदबीनं. ‘आपण करतोय त्याची आपल्याला खंत वाटते, नाइलाज आहे म्हणून हे करतोय,’ अशा प्रकारच्या आविर्भावात तो अपील करायचा. त्यामुळे त्याच्यावर सर Neville cardus नं फार सुंदर लिहिलं होतं. त्यानं असं लिहिलं होतं : ‘‘He appeals with ball in one hand and apology in the other.’’  आज जगातल्या कुठल्याही यष्टिरक्षकाला हा जर किस्सा सांगितला तर तो त्यावर विश्वास ठेवणार नाही. कारण, ही गोष्ट म्हणजे कसायाला बकऱ्याबद्दल प्रेम वाटण्यासारखं आहे!


आज यष्टिरक्षकाचं काम फक्त यष्टिरक्षण करणं एवढंच नसतं, म्हणजे यष्टिरक्षण करण्याबरोबरच आणखी दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याला कराव्या लागतात. एक, आपल्या गोलंदाजांना प्रोत्साहन देणं. या कामाबद्दल कुणाचं विरोधी मत असू नये. आणि दुसरं काम म्हणजे, मागं उभं राहून, येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाचा तेजोभंग करणं...


जसा कर्ण-अर्जुनयुद्धात श्रीकृष्ण कर्णाचा वारंवार करत होता तसा. अपील अत्यंत नाट्यपूर्ण करायचं हे तर ठरून गेलेलं. अपीलचा ‘पोवाडा’ हा यष्टिरक्षकानं म्हणायचा आणि स्लिपमधल्या आणि इतर क्षेत्ररक्षकांनी ‘जी जी’ म्हणायचं! म्हणजे, फलंदाज पायचीत झालाय हे ज्या खेळाडूंना नीट दिसतही नाही असे खेळाडूसुद्धा बऱ्याच वेळा अपील करण्यात सहभागी झालेले मी पाहिलेले आहेत. अर्थात्‌, आता हे हळूहळू कमी झालं आहे. कारण, डीआरएसचा नियम आला. त्यामागची भूमिका अशी असायची की जर एखादा फलंदाज बाद होत नसेल तर वारंवार अपील करून त्याच्यावर दबाव टाकायचा आणि त्याचबरोबर पंचांवरही दबाव टाकायचा. अर्थात्‌, आता डीआरएसमुळे असं घडत नाही. कारण, जर फलंदाजाला वाटलं की तो बाद नाहीये तर फलंदाज लगेच डीआरएस घेतो. मग, ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जातं.


आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही असे काही खेळाडू किंवा अशा काही गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. म्हणजे, अगदी लहानपणची मी आठवण सांगतो. मुंबईत सन १९६७ मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज असा कसोटी सामना होता आणि भारताच्या दुसऱ्या डावात ग्रिफिथच्या गोलंदाजीवर सोबर्सनं स्लिपमध्ये झेल घेतला आणि कुंदरन बाद झाला. ग्रिफिथनं अपील केलं आणि पंचांनी त्याला बाद दिलं. कुंदरन पॅव्हेलियनकडे जायला निघाला होता. इतक्यात सोबर्सनं त्याला थांबवलं आणि त्यानं पंचांना सांगितलं की, ‘‘मी कॅच नीट घेतलेला नाहीये, तो जमिनीवर पडून माझ्या हातात आलाय.’’ कुंदरनला परत बोलावण्यात आलं आणि कुंदरननं नंतर ७९ धावांची झंझावाती खेळी केली. अर्थात्‌, वेस्ट इंडीजनं तो सामना जिंकला; पण तो सामना जिंकताना त्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले.


असाच एक आपला महात्मा म्हणजे विश्वनाथ. विश्वनाथला जर कधी असं वाटलं की तो बाद झालाय तर विश्वनाथ कधीही थांबलेला नाही. तो निघून गेलेला आहे. त्यानं पंचांच्या बोटाकडे बघण्याची तसदीसुद्धा घेतलेली नाही. आणि असेसुद्धा बरेच प्रसंग घडले असतील की, ज्या वेळी विश्वनाथ बाद नसतानासुद्धा त्याला बाद दिलं गेलेलं आहे आणि पंचांनी बाद द्यायच्या आत, आपण निघून जातोय, या गोष्टीचा विश्वनाथला कधी पश्चात्ताप झालेला नसेल. 


सन २०११ च्या वर्ल्ड कपनंतर जेव्हा भारतीय संघ इंग्लंडमध्ये गेला तेव्हा इयान बेलला आपला यष्टिरक्षक आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं अशाच परिस्थितीत परत बोलावलं होतं. त्यानंतर अर्थातच असं फार क्वचित घडलंय. जर घडलं असेल तर मला ठाऊक नाही आणि आता घडण्याची शक्यताही कमी आहे. आता डीआरएस आलं, नवीन नवीन नियम आले, त्यामुळे फलंदाज बाद आहे की नाही, हे लगेच कळून चुकतं. फलंदाजाला दया दाखवणं ही गोष्ट आता जुनाट झालेली आहे. धर्मराज व्हायचं की कृष्ण? आजच्या पिढीनं कृष्ण स्वीकारला आहे. उघडा होऊन, सुदर्शन चक्राप्रमाणे गर गर शर्ट फिरवणारा गांगुली हा त्याचं प्रतीक आहे!

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

Thursday, July 22, 2021

9:49 PM

Nine arrested for arranging child marriage in Assam

 GUWAHATI: Police in Barpeta district arrested nine persons, including the bridegroom, his relatives and uncle of a 15-year-old girl for trying to marry her off, reinforcing the belief that child marriages are still prevalent in many remote villages of the lower Assam districts.

Police swung into action following a complaint filed by Barpeta-based child rights activist Rafiqul Islam. However, the wedding rituals were over when the police team reached the place. The girl has been rescued and sent to a home.

Kadam Afi, 25, the bridegroom, the bride’s uncle Nabur Uddin and Jasim Uddin, a kazi by profession who solemnized the marriage, were arrested from the wedding venue at Pub Chatla village under Sarthebari police station, about 30km from the district headquarters. The other arrested persons are Jinnat Ali, Habibar Rahman, Gaher Chand Ali, Abdullah Ali, Sharif Ali and Naskar Ali.


“The marriage was solemnized in sharp violation of the Prohibition of Child Marriage Act, 2006. A case was registered under Sections 9,10 and 11 of the act and all the nine accused helped in the execution, arrangement and solemnization of the marriage. A court has sent them to 14 days judicial custody,” sub-inspector of Sarthebari police, Pranab Kumai Das, said.

He said that the girl is studying in Class 10 while the bridegroom is a labourer.

Rafiqul told TOI that during the pandemic, most child marriages are going unreported though those are highly prevalent.

“Most marriages are kept secret and there would be very few in the police record. The actual number is much higher than the figures in the report. I receive at least one case of child marriage a day Only relatives would know. Sometimes a person of social influence knows. The kazi plays a key role in fudging the girl’s age. Sometimes the girls are taken to distant relatives’ places to hide their age,” Rafiqul, who is working in this field for the past many years, said.

He said that the main reasons behind such marriages are poverty and lack of education. “Many such families believe that sooner their boys get married, another member will be added to their families, who will contribute to the family income, caring least about the health of the minor mother and her child,” Rafiqul added.

Chittapriyo Sadhu of Save the Children NGO said the Covid-19 pandemic has created an unprecedented situation.

"It has resulted in increased poverty, hunger, disruption of school education and lack of care and protection of children,” Sadhu said.